Saturday, September 5, 2009

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल.
परंतु त्याच बरोबर हा २८ नोव्हेंबर ! हा दिवस सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. भारतीय शैक्षणिक व सामाजिक क्रांतिचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतीदिन! बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या या महात्म्याला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनःपुर्वक आदरांजली आपण वाहिली पाहिजे. बहुजनांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या या महात्म्याच्या कार्याला वंदन करून २८ नोव्हे. हा दिवस सुद्धा शिक्षक दिन म्हणून आपण पाळला पाहिजे ही प्रामाणिक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Monday, August 31, 2009

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव शिवदास यांच्या मनमानीपणाचा मराठी बीएमएमला फटका



मराठी अभ्यास केंद्र


सक्षम मराठी... प्रगत महाराष्ट्र
(नोंदणी क्रमांक- महा/६९४/०९/ठाणे)कार्यालय संपर्क - ३, यमुना निवास, गोविंद बच्चाजी मार्ग, चरई, ठाणे- ४०० ६०२. दू- २५३४३६१९


उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव शिवदास यांच्या मनमानीपणाचा मराठी बीएमएमला फटका

बीएमएम मराठी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २००९-१० मध्ये सुरु करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी मंजुरी देऊनदेखील त्या विभागातील सहसचिव शिवदास यांच्या आडमुठेपणामुळे ह्यासंदर्भातील शासन निर्णय निघण्यास विनाकारण वेळ लागत आहे. याचा फटका हा अभ्यासक्रम राबवण्यासाठी गेले दीड महिना विनाकारण ताटकळत बसलेल्या चौदा महाविद्यालयांना पडला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारानंतर व उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या निर्णयानंतरही यात आडकाठी आणणाऱ्या सहसचिव शिवदास यांच्या मुजोर वर्तनाबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीएमएम मराठीच्या अनुमतीचे पत्र (क्रमांक-एनजीसी-२००९/(१०६/०९)/मशि- ४) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २५ जून २००९ रोजीच प्रसिद्ध केलेले आहे. या पत्रात हा अभ्यासक्रम या वर्षी चालू करण्याचे नि:संदिग्ध आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच पत्रात विद्यापीठ कायद्यातील मान्यतेबाबतच्या तरतुदींना अपवाद करून महाविद्यालयांचे प्रस्ताव मागवून घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत.
या पत्राच्या आधारावरच हा अभ्यासक्रम राबविण्यासाठी आवश्यक संलग्नता प्रस्ताव मुंबई विद्यापीठाने मागवले. मिळालेल्या प्रस्तावांची आवश्यक सोयीसुविधा व अध्यापन-तयारी अशा निकषांवर योग्यप्रकारे छाननी करुनच बावीसपैकी चौदा महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने स्वीकारले. यात चिपळूण, भाईंदर, विरार, कळंबोली येथील महाविद्यालयांचादेखील समावेश आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ आणि व्यवस्थापन परिषद यांनी रीतसर मंजुरी दिलेले प्रस्ताव २४ जुलै रोजी शासनाला सादर केले गेले. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी सही केलेली असतानादेखील त्या खात्यातील सहसचिव शिवदास यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. जवळपास साठ महाविद्यालयांत शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी बीएमएममध्ये अनेक महाविद्यालयांत सोयी-सुविधांच्या नावाने बोंब असतानादेखील त्यांना मात्र त्वरीत मान्यता मिळते, मात्र केवळ मराठीच्या बीएमएमच्या बाबतीतच प्राध्यापकांची उपलब्धता वगैरे गोष्टींबाबत विनाकारण बाऊ करण्यात येत आहे. मराठी बीएमएमची फाईल लाल फितीत कशी अडकून राहिल याचीच ‘काळजी’ हे सहसचिव घेत असून त्यामुळे मंत्र्यांच्या निर्णयाचे व लोकप्रतिनीधींच्या आग्रहाची उघडउघड पायमल्ली होत आहे.
काल उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधानसचिव जे.एस. सहारिया यांच्या दालनात मराठी अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधीनीं श्री. शिवदास यांची भेट घेतली. हा अभ्यासक्रम चालवण्यासाठी प्रस्तावित महाविद्यालये सक्षम आहेत का असा प्रश्न शिवदास यांनी अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधीना विचारला. त्यावर या चौदा महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने रीतसर छाननी करुनच पाठवले असल्याने त्यांची सक्षमता विद्यापीठाने तपासलीच आहे अशी भूमिका या प्रतिनिधींनी मांडली. यानंतर अभ्यास केंद्राने कुलगुरु डॉ.विजय खोले यांच्याशी संपर्क साधला असता सहसचिव मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानेच या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
एखादा सहसचिव आपल्या अधिकारात चौदा महाविद्यालयांची संख्या चारवर आणू शकतो का ? मंत्र्यांनी सही केल्यावर शासननिर्णय जाहीर करण्यात वेळकाढूपणा करणार्‍या सहसचिवावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग काय कारवाई करणार आहे ? या दिरंगाईला विद्यापीठ आणि शासनातली मराठीद्वेष्ठी मंडळी मदत करताहेत का? असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. गेले दोन महिने या नव्या अभ्यासक्रमाचा अकाली मृत्यू व्हावा यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवदास यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. याबाबतीत तात्काळ कारवाई झाली नाही तर विद्यार्थी संघटना व राजकीय पक्ष हा प्रश्न आपल्या पद्धतीने हाताळू शकतील व त्याची जबाबदारी शिवदास आणि त्यांच्या मराठीद्वेष्ट्या बोलवत्या धन्यांवर राहील असा इशारा अभ्यास केंद्राने दिला आहे.

Friday, June 26, 2009

पुढारी स्पेशल....आपले हुशार ? परीक्षा नियंत्रक


ह्यांची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. कोणाला पाहायची असल्यास अवश्य संपर्क साधावा.......

Thursday, May 28, 2009

विद्यापीठातील भ्रष्टाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी...

शहापूर येथील एका बी. एड. महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळवून देण्यासाठी त्या बदल्यात संबंधित संस्थाचालकाकडून लाच घेताना मुंबई विद्यापीठाच्या संलग्नता विभागाचे उपकुलसचिव प्रकाश गोसावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

हे महाविद्यालय सुरू करण्याची मंजुरी राज्य सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिली होती. या महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता मिळण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्षांनी विद्यापीठात अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने डिसेंबर 2008 मध्ये महाविद्यालयाचे निरीक्षण करून जानेवारीमध्ये विद्यापीठाला अहवाल दिला होता. परंतु, महाविद्यालयाने अनेक निकष पूर्ण केले नसल्याने समितीने विद्यापीठाला नकारात्मक अहवाल सादर केला होता. परंतु, हा अहवाल हवा तसा करून संस्थेला झुकते माप देण्याचे आश्वासन गोसावी यांनी दिले. त्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयांची लाच मागितली. त्यापैकी १० हजाराचा पहिला हप्ता संस्थाचालकांनी यापूर्वीच दिला होता. उरलेली रक्कम घेत असतानाच सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोसावी यांना रंगेहाथ पकडले. या घटनेचे तीव्र पडसाद शिक्षणक्षेत्रात उमटले आहेत.

गोसावींना झालेली अटक म्हणजे कुलगुरू उपकुलगुरू यांच्या कारभाराला काळीमा फासणारी त्यांच्या नाकर्तेपणाचे दर्शन घडविणारी घटना आहे, विद्यापीठाच्या या अशा अनेक गैरप्रकारांबाबत काही मोजकेच अधिसभा सदस्य नेहमी वाचा फोडत असतात, लेखी निवेदने देत असतात, पण बुरखा पांघरलेल्या कुलगुरू-उपकुलगुरूंवर त्याचा काहीही परिणाम होत नाही किंबहुना हेच उच्चपदस्थ अशा अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालतात, असा आरोप 'मुक्ता'ने केला आहे.विद्यापीठातील या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी कुलगुरू, प्र-कुलगुरू,कुलसचिव, तसेच परीक्षानियंत्रक यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.


Sunday, February 15, 2009

कुलगुरूंनी कोंडून घेतले! - लोकसत्ता


कुलगुरूंनी कोंडून घेतले!
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठातील स्टिंग ऑपरेशन तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व समतावादी छात्रभारती या दोन्ही संघटनांवर घातलेली बंदी या मुद्दय़ावरून पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पंचाईत झाल्याने कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी आज पत्रकार परिषदेनंतर घाईघाईने काढता पाय घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी तब्बल दोन तास स्वत:लाच कार्यालयात कोंडून घेत पत्रकारांना टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या प्रकारानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी रात्री डॉ. खोले व प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांना तातडीने आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले.
‘स्पिरीच्युअल जर्नी : आस्पेक्ट ऑफ सिख स्टडीज’ या विषयावर विद्यापीठात १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची माहिती देण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी आज कालिना संकुलात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती दिल्यानंतर मनविसे व समतावादी छात्रभारती या संघटनांवर घातलेली बंदी, स्टिंग ऑपरेशनचे प्रकरण हे मुद्दे उपस्थित करीत पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. या प्रकरणाची चौकशी चालू आहे, पत्रकार परिषद फक्त आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित केली आहे असे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्टिंग ऑपरेशनमुळे विद्यापीठाची बदनामी झाली आहे, त्यामुळे तुम्ही विद्यापीठाची केवळ भूमिका मांडा. हवे तर आम्ही कॅमरे बंद ठेवतो, अशी विनंती पत्रकारांनी केली. पण पत्रकार परीषद संपल्याचे सांगत त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कुलगुरूंनी पत्रकारांना त्यांच्या केबिनमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेर पाठविले व आतून कडी लावली. जनसंपर्क अधिकारी आशुतोष राठोड यांची तर भंबेरीच उडाली. कुलगुरू नंतर पत्रकार परिषद घेतील, तुम्ही इथून जा अशी विनवणी ते करू लागले. सुरक्षा रक्षकांनांही त्यांनी पाचारण केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करू नका, असा दम भरत राठोड यांनी पोलिसांना पाचारण करू असा इशाराही देवून पाहिला. राठोड यांचे कोणी ऐकत नाही हे लक्षात आल्याने कुलगुरूंनीच काही पत्रकारांना फोन केला व मी कार्यालयातून निघून गेलो आहे; तुम्हीही निघून जा, अशी विनवणी करून पाहिले. अखेर सायंकाळी सात वाजून नंतर बातमी देण्याच्या घाईमुळे सर्व पत्रकार निघून गेले आणि अखेरीस डॉ. खोले यांची सुटका झाली. 

Tuesday, February 10, 2009

अग्रलेखांचा बादशहा-नवाकाळ यांचा अग्रलेख


इथे सुद्धा वाचता येईल. कोणाला पाहिजे असल्यास सांगा मी Pdf ई-मेल करीन. परीक्षा भवनात किती अंदाधुंदी चालते याची कल्पना यावरून येते.गिरे तो भी टांग उपर अशी परिस्थिती सद्ध्या दिसत आहे. अंगावरचे कपडे उतरले तरीही ज्यांनी लाज सोडून नाचायचच ठरविले त्याविषयी काय बोलायचे? तुम्हाला काय वाटते? अवश्य कळवा.